Thursday, 25 December 2025

वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

 वीर बाल दिवस कार्यक्रम संपन्न.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट,

ता. धरणगाव, जि. जळगाव

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना साहिबजादे जोरावर सिंह व साहिबजादे फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य, त्याग व बलिदानाची ओळख करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांना वीर बाल दिवस या विषयावरील ध्वनी-चित्रफित (व्हिडिओ) दाखवण्यात आली. या चित्रफितीतून साहिबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर शिक्षकांनी वीर बाल दिवसाचे महत्त्व तसेच या वीर बालकांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना सोप्या व समजण्याजोग्या भाषेत मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्र रंगवा स्पर्धा तसेच इतर सर्जनशील व शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

सदर कार्यक्रमास शाळेतील उपशिक्षक शैलेश शिरसाठ, मुख्याध्यापक श्री. भटू पाटील तसेच केंद्रप्रमुख श्री. प्रभात तडवी हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, धैर्य, त्याग व देशभक्तीची भावना रुजण्यास मदत झाली. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.




Sunday, 7 December 2025

किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

 किनगावच्या लौकिकाची 'विजयी दिशा'

किनगाव ता.यावल चे मुळ रहीवाशी आणि संभाजी ब्रिगेडचे यावल तालुका अध्यक्ष श्री.विजय पाटील यांची दिशा ही सुकन्या  होय .

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा अभिमान! खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये दिशा पाटील च्या उत्कृष्ट खेळाने मिळवून दिले विद्यापीठाला सुवर्णपदक

       भरतपूर राजस्थान येथे 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर आयोजित खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये अंतिम सामन्यातील

63 किलोग्रॅम वजनी गटात 'बॉक्सिंग' या क्रीडा प्रकारात दिशा विजय पाटील हिने दमदार कामगिरी करत सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदकाची शानदार कमाई केली आहे.अंतिम सामन्यात हरियाणाच्या बॉक्सरवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत दिशाने तिचे कौशल्य, जिद्द, आणि उत्कृष्ट खेळाची चमक दाखवली.दिशाच्या या भव्य विजयामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह खानदेश (जळगांव जिल्हाचे ) यावल तालुक्यातील किनगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळून निघाले असून विद्यापीठाचा मान-अभिमान अधिक उंचावला आहे.