Saturday, 20 June 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट ता.धरणगाव जि जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

धरणगाव तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा फुलपाट येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत संकल्पना “Yoga for Healthy Ageing – ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’” अशी असून, निरोगी आणि सक्रिय आयुष्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही संकल्पना आहे. 

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानसाधना सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा रोझोतकर तसेच शिक्षक शैलेश शिरसाठ यांनी विद्यार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेत योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि एकाग्रता कशी वाढते याचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास केल्यास शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते तसेच वाढत्या वयातही उत्साही जीवन जगता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या प्रस्तावानंतर झाली. संयुक्त राष्ट्र संघाने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” म्हणून घोषित केला आणि पहिला योग दिन २१ जून २०१५ रोजी जगभरात साजरा करण्यात आला. 



गेल्या बारा वर्षांतील आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संकल्पना

वर्ष -थीम / संकल्पना

२०१५- Yoga for Harmony & Peace

२०१६- Connect the Youth

२०१७- Yoga for Health

२०१८- Yoga for Peace

२०१९- Climate Action

२०२०- Yoga for Health – Yoga at Home

२०२१- Yoga for Wellness

२०२२- Yoga for Humanity

२०२३- Yoga for Vasudhaiva Kutumbakam

२०२४- Yoga for Self and Society

२०२५- Yoga for One Earth, One Health

२०२६- Yoga for Healthy Ageing.

Thursday, 21 May 2026

प्रिय राम  दादा,जय जिजाऊ🙏 सध्या बऱ्यापैकी धावपळ असल्यामुळे आपली भेट प्रत्यक्ष होऊ शकली नाही. दोन दिवसांपूर्वी आपण तपासणीसाठी पुणे असल्यामुळे मुद्दामूनच आपल्याला कॉल केला नाही. आपण आपल्या तब्येतीची काळजी घ्या कारण आपली तब्येत जळगावच्या सामाजिक चळवळीची आणि विचारांची तब्येत आहे. त्या अर्थाने आपल्या डोक्यात स्वतःचाच मेंदू असणाऱ्या आणि नसणाऱ्यांचे पालक अर्थात मोठे भाऊ या नात्याने जबाबदारी देखील अधिक आहे.सांबरे साहेब येतील त्यावेळेला आपल्या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात होईलच याउलट मला असं वाटत होतं की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जर मराठा सेवा संघाची शाखा आहे तर त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोजगार संदर्भात मार्गदर्शनासाठी तसेच विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी मराठा सेवा संघाचे स्वतःचे सेंटर असावे आपल्या जळगावला जिजाऊ संस्थेच काम सुरू होणार आहे अन्यथा महाराष्ट्रात पहिली संस्था जळगाव मध्ये आपल्या नेतृत्वाखाली सुरू करता आली असती. असो आपले सामाजिक कार्य अफाट आहे आपल्या सर्वांचा सामाजिक विचारांचा DNA सारखा असल्यामुळे ते काम सुरूच राहील परंतु येणाऱ्या नवीन पिढ्यांसाठी आपल्याला काही ठोस करता येईल तर करूया शेवटी तुम्ही किंवा मी एवढे मोठे नाही पण तुम्ही आणि आपण सारे मिळून आपण मोठं काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

 पत्रात *DNA* चा उल्लेख केला ते आपलं नातं सांगणारच आहे कारण *तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय....🚩* आपलाच शैलेश.✍️

Friday, 1 May 2026

Reflection of Teamwork

 मनोरंजनाच्या काही माध्यमातून गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत आहे का ? असा प्रश्न समाजमनास पडत असतानाच चित्रपटांच्या माध्यमातून गंमत जंमत बाल चित्रपट महोत्सवा महोत्सवातून आमच्या संपूर्ण टीमने केलेल्या प्रयत्नांना उदंड प्रतिसाद मिळाला आणि संस्कारक्षम वयात मुलांना काही देता आलं याच समाधान आमच्या सर्व सदस्यांना अनुभवता आलं.


दिनांक २४,२५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या पहिल्या गंमत जंमत बाल चित्रपट महोत्सवाचा आनंद लहान थोर साऱ्यांनीच घेतला. चित्रपट हे प्रेरणादायी अनुभव असतात म्हणूनच गेल्या बारा वर्षापासून सुरू असलेल्या My Movie My Mitivation या वैयक्तिक उपक्रमानंतर अजिंठा फिल्म सोसायटी, बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा आणि रिफ्लेक्शन फाउंडेशन संचलित पालक शाळा तिन्ही संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत गंमत जंमत बाल चित्रपट महोत्सवाचा अनुभव उत्साह वाढवणारा होता. When you are working in and as a team and getting success then the success is nothing but the reflection of teamwork.✍️ शैलेश कमल किसन शिरसाठ.







Tuesday, 28 April 2026

भारतातल्या आजच्या जेन झी (Gen Z) पिढीच खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

 भारतातल्या आजच्या जेन झी (Gen Z) पिढीच खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे म्हणजे देशभरात NEET नीट चा एवढा मोठा पेपर फुटीचा घोटाळा झाला,त्याचा अत्यंत वाईट परिणाम स्वतः जेन झी असलेला तरुणांवर झाला. मुलांच्या आक्रोश करताना आणि रडतानाचे व्हिडिओ आपण काहीच थोड्या सोशल मीडियावर बघितले असेलही. एरवी शेजारच्याचा वाऱ्याने चुकून आलेला कचरा देखील आपण आपल्या अंगणात सहन करत नाही प्रसंगी त्यावेळेला आपण शेजारच्यांशी सुद्धा भांडतो परंतु विविध परीक्षांमध्ये वारंवार होणारे पेपर फुटी आणि त्या विरोधात कुठलाही आंदोलन न करता अगदी शांत भूमिका घेतल्यामुळे खरंच भारतातल्या आजच्या जेन झीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

 इतर कोणत्याही देशात सतत होणाऱ्या परीक्षांच्या घोटाळ्यामुळे समस्या निर्माण झाल्या असत्या तर कदाचित त्या देशांमध्ये जेन झी सह इतर सर्व वयोगटातील त्या त्या देशातल्या लोकांना सरकार विरुद्ध आंदोलन करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील घेतला असता पण आपल्या देशात जेन झी सह इतर सर्व वयोगटातील आदर्श नागरिकांनी शांततेचा मार्ग अवलंबून त्याविरुद्ध ब्र शब्द देखील बोलले नाहीत, कुठेही मोर्चा नाही किंवा आंदोलन नाही. यावर कोणीतरी देशद्रोही अशी टीका करू शकता की असं चुकीच्या गोष्टी विरुद्ध न लढता सर्व लोक केव्हा आपला वैयक्तिक स्वार्थ बघतात आणि जाती धर्म पंथांमध्ये विभागलेल्यामुळे एक होत नाहीत परंतु तसे नाही आपल्या देशातील जेन झी सह सर्वच लोक संयमाची भूमिका घेत आहेत बघ्याची नाही.

 नाशिक मध्ये झालेल्या वृक्ष तोडीच्या वेळी देखील आपण सारे भारतीय आणि आपले जेन झी यांनी शांत राहून संयमाची भूमिका घेतली आहे. 

अलीकडे नर्मदा नदी मध्ये धार्मिक कर्मकांडाचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणात दुधाचा टँकर अर्पण केल्याची घटना चर्चेत आली.भारतासारख्या देशात, जिथे अजूनही कुपोषण मोठी समस्या आहे.2024 च्या Global Hunger Index अहवालानुसार भारताचा क्रमांक 105 वा होता. भारताला 127 देशांपैकी 105 वे स्थान मिळाले असून भारताचा स्कोअर 27.3 होता, जो 'Serious '(गंभीर) श्रेणीत मोडतो. असे असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पोषणास उपयुक्त दुधाचा अपव्यय झाला म्हणून आपल्या भारतातील जेन झी ने या विरोधात आंदोलन सोडा परंतु निषेध सुद्धा पुरेसा नोंदवला नाही आणि शांततेची आणि संयमाची भूमिका घेतली खरच भारतातल्या आजच्या जेन झी च कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

 रोमँटिक चित्रपट पाहताना चित्रपटातील कथानक हे सत्य नसून एक चित्रपट आहे याची जाणीव असल्यावरही नायक नायकेच्या विरहामुळे अत्यंत भावनिक होऊन रडणारे भावनाप्रधान Gen Z आपण थेटर मध्ये आणि थेटर च्या बाहेर पाहिले. आणि त्याच वेळेला इराण आणि इजराइल युद्ध दरम्यान इराण मध्ये एका शाळेवर पडलेल्या क्षेपणास्त्रामुळे तेथील शाळकरी मुली मृत्युमुखी पडल्या अशावेळी इतर देशातील जेन झी ने त्याबद्दल खेद व्यक्त केला आणि चुकून जरी लहान बालिकांवर हल्ला झाला असला तरी त्याचा निषेध व्यक्त केला अशावेळी देखील आपल्या जेन झी ने तटस्थतेची भूमिका घेत निषेध व्यक्त न करता यावर फारसे भाष्य केले नाही त्यामुळे देखील भारतातल्या जेन झी च कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

 अर्थात चिनी आणि अमेरिकी तंत्रज्ञानावर स्वार झालेले भारतीय जेन झीच कौतुक आहेच परंतु अशा प्रकारचे शांततेची भूमिका घेत कुठलंही शांततेच्या मार्गाने देखील आंदोलन न करणार जेन झीच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पिढ्यांचे ही कौतुक केले पाहिजे कारण शेतकऱ्यांचा प्रश्न असो किंवा बेरोजगारीचा आपले सर्व जबाबदार भारतीय नागरिक मोठ्या संयमाने अधिकाधिक शांत राहून जगाला आपल्या संयमाचा परिचय देत आहेत.

 आपल्या शेजारील सर्वच देशातील Gen Z च्या तुलनेत शांत,संयमी Gen Z सह साऱ्याच भारतीय बांधवांचे कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

Saturday, 25 April 2026

बाल चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा उत्साह उसळला, आनंदाची लाट पुन्हा हाऊसफुल्ल झाली.

 चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम - शिक्षणाधिकारी निलेश पाटील.

अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, पालक शाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. 

जळगाव (प्रतिनिधी) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बालवयातच उत्तम साहित्याची आणि कलेची आवड निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.

'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुलांसाठी मटर पनीर, मंग्या , रिबेल आणि देवा तुला शोधु कुठे या ४ विशेष जागतिक दर्जाच्या बाललघूचित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. चिमुकल्यांच्या उत्साहाने भाऊंचे उद्यान परिसर बहरून गेला होता. 

प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, पालक शाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे रत्नाकर पाटील, डॉ.विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शुक्ल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. यावेळी प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधून त्यांना आज दाखविलेल्या चित्रपटांतील मूल्यांची माहिती दिली. 

बालचित्रपट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधनेचे कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, पालकशाळेचे डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, शैलेश शिरसाठ, डॉ. विशाखा पाटील, श्वेता जैन, मकरंद डबीर, अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्थ डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतले.

उद्या बालचित्रपट महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' या मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपट मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि बुद्धिवान कामगिरीवर आधारित ‘रणपती : आग्र्याहून सुटका’ हा चित्रपट बालप्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. तरी पालकांनी या चित्रपटाला आपल्या पाल्यांना घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday, 24 April 2026

बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. खुल्या वातावरणात मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रेक्षणाचा आनंद घेताना लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. चित्रपटातील संदेश, मनोरंजन आणि शिक्षण यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना भावला. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखले गेले आणि सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. एकूणच, महोत्सवाची सुरुवात अत्यंत यशस्वी ठरली.


बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल - महापौर दीपमाला काळे

जळगाव (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत, अशा वेळी त्यांना मानवी मूल्ये शिकवणारे चित्रपट दाखवणे आवश्यक आहे. या बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक भान आणि कलेची आवड निर्माण होईल असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

 पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि. २४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय 'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यानात दररोज सायंकाळी ६ः३० वाजता करण्यात आले आहे.

उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत आयोजकांतर्फे जयेंद्र लेकुरवाळे, विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना महापौर काळे यांनी भविष्यातही शहरात अशा उपक्रमांचे आयोजन केल्यास त्याला महानगरपालिका निश्चित सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे श्री. रत्नाकर पाटील ,डॉ.विद्या पाटील,शैलेश शिरसाठ,बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेती फिल्म 'शाळा सुटली' तसेच 'बेबीज डे आउट' या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उस्फुर्त दाद दिली. शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.