Wednesday, 18 February 2026

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे म्हणजे काय रे भो ?

वरील प्रश्न पडल्यास खालील बाबींवर विचार करूया .

• ऐन सुट्टीच्या कालावधीत आणि सणांच्या कालावधीत तीन चार पट भाडेवाढ करणाऱ्या खाजगी वाहन व्यवस्थेला  जाब विचारणे आणि योग्य भाडेसाठी लोकशाही मार्गाने आग्रह धरणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

• संघ भावना आणि एकजुटीसाठी असणारे खेळ जातीपातीत विभागून फक्त विशिष्ट जातीच्या खेळाडूंनाच स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी देणाऱ्या  स्पर्धेचा निषेध न करता, विरोध न करता प्रोत्साहित करणे आणि जन्माने मिळालेल्या आपापल्या जाती आणि स्वतः कमावलेला जाती श्रेष्ठत्वाचा अहंभाव  कुराळात बसणे बंद करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

 • छत्रपती शिवरायांच स्वराज्य म्हणजे  रयतेच राज्य हे वैशिष्ट्य सांगून शिवरायांनी स्थापित केलेले स्वराज्य हे कोणा एका जाती धर्मियांसाठी नसून न्यायाचे राज्य होतं याचा प्रचार प्रसार करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

 • विवेकवादी विचारांचा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार आणि अंगीकार करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

• स्त्रियांवरील लिहिल्या गेलेल्या आणि सादर केल्या जाणाऱ्या अश्लील,अश्लाघ्य गीत संगीताचा निषेध करणे आणि त्यावर बंदी आणणे. निषेध नोंदवण्यासाठी आणि बंदी  आणण्यासाठी बोलणे, लिहिणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

 • आपल्या घरच्या किंवा सार्वजनिक कार्यक्रमात ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून इतरांना छळणे थांबवणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

 • एखादी दुर्दैवी घटना किंवा आपातकालीन परिस्थिती खेरीज आपल्या खाजगी कार्यक्रमांसाठी सार्वजनिक रस्ता अडवणे, बंद करणे शक्य असल्यास टाळले पाहिजे आणि असे टाळणे  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

• सार्वजनिक सण उत्सव साजरे करत असतांना पैशाची प्रचंड उधळपट्टी ऐवजी शिक्षणावर किंवा इतर लोक हितासाठी पैसा खर्च करणे म्हणजेच शिवरायांच्या रयतेच्या राज्यासाठी काम करणे होय. नैतिकतेच्या आधारावर सार्वजनिक हिताचे निर्णय घेणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आणि शिवजयंती साजरी करणे.

 वरील सर्व बाबी आपली नोकरी,व्यवसाय कौटुंबिक जबाबदारी सांभाळून करता येऊ शकतात, बोलता येऊ शकत,लिहिता येऊ शकत आपण किमान 20 -25 लोकांपर्यंत विचार पोहोचवू शकतो.

  शिवरायांच राज्य हे रयतेच राज्य असल्यामुळे शिवरायांना देखील वरील उल्लेख केलेल्या चुकीच्या बाबी आवडल्या नसत्या शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता कोण्या एका धर्मा विरोधात नव्हे तर अधर्मा विरोधात होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत कारण शिवशाही म्हणजे 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय'.

 तुम्हास शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

 तुमचा शैलेश.✍️

Image courtesy bolbhidu





Wednesday, 11 February 2026

डार्विनचा survival of fittest सिद्धांत आणि दुर्गम आदिवासी भागात जगण्यासाठी fittest नसलेल्या, मृत्यूशयेवरील नवजात बालकांच्या survival साठी बंग कुटुंबीयांचे अमृतासम अभय निर्माण.

प्रिय वाचक आणि विद्यार्थी मित्रांनो,

 दुर्गम भागात आपल्या आरोग्य सेवांच्या माध्यमातून जीव वाचवणाऱ्या 'सर्च', 'निर्माण' सारख्या संस्था आणि डॉ.बंग कुटुंबीयांसारखे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

 आज १२ फेब्रुवारी उत्क्रांतीच्या सिद्धांताचे जनक चार्ल्स डार्विन यांची जयंती. काल दैनिक लोकमत मध्ये पर्पजफुल या सदरात सर्च आणि निर्माण या युवा उपक्रमाचे प्रमुख आणि सहसंचालक अमृत बंग यांच्या सर्व्हायव्हल ऑफ द 'फिटेस्ट' नव्हे सर्व्हायव्हल ऑफ द 'काइंडेस्ट'! या लेखा निमित्ताने हा फक्त पत्र प्रपंच.✍️

अभय बंग यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० रोजी वर्धा येथे गांधीवादी कार्यकर्ते ठाकुरदास बंग आणि सुमन बंग यांच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये कार्यरत होते. अभय यांचे शिक्षण वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात नयी तालीम पद्धतीने झाले.

डॉ.अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग हे वैद्यकीय संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोली येथे ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सेवा, संशोधन आणि सामाजिक कार्य करतात. त्यांच्या बालमृत्यू नियंत्रणावरील संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली असून, भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि अनेक आफ्रिकन देशांमध्ये त्यांचे मॉडेल वापरले जाते. त्यांचे लेख वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेट मध्ये प्रकाशित झाले आहेत. 

१९८८ मध्ये स्थापन केलेल्या सर्च संस्थेमार्फत त्यांनी ५८ गावांतील ४८,००० लोकांना वैद्यकीय सेवा पुरवल्या. अशिक्षित महिलांना प्रशिक्षण देऊन आरोग्यदूत म्हणून कार्यरत केले.

अभय बंग यांनी रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा शास्त्रीय अभ्यास करून मजुरी ४ वरून १२ रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला, जो सरकारने मान्य केला. त्यांचे संशोधन "लोकांसोबत" करण्यावर त्यांचा भर आहे. त्यांनी न्युमोनियाचे बालमृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सिद्ध केले.अभय बंग यांनी विकसित केलेल्या ब्रेथ काउंटर उपकरणामुळे ग्रामीण महिलांना नवजात बालकांच्या न्युमोनियाचे निदान करणे शक्य झाले. यावर त्यांचा शोधनिबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला.

गडचिरोलीतील कुपोषण आणि नवजात मृत्यूंवरील "कोवळी पानगळ" हा शोधप्रबंध लॅन्सेटमध्ये प्रकाशित झाला. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला आपले धोरण बदलावे लागले.

अभय बंग यांच्यावर महात्मा गांधी, लोक आणि विज्ञान यांचा प्रभाव आहे. त्यांचे शिक्षक कार्ल टेलर यांनी "लोकांचे प्रश्न समजून त्यावर काम करा" हा विचार दिला. बंग दांपत्याची लोकांशी संवाद साधण्याची आणि साध्या उदाहरणांतून विषय समजावण्याची पद्धत प्रभावी आहे.

 इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मनुष्य प्राणी जन्म झाल्यानंतर स्वतःच्या शारीरिक क्षमता विकसित करून स्वतःचे पोषण करू शकेल अशा अवस्थेत यायला अधिक वेळ घेतो तो शारीरिक दृष्ट्या पूर्ण सक्षम होण्याच्या आधीच इतर प्राण्यांनी त्याची शिकार केल्यास मानवाच अस्तित्व शिल्लक राहू शकणार नाही आणि म्हणूनच मानवास एकमेकांच्या सहयोगानेच मनुष्य प्राण्याला तसेच एकंदरीतच पर्यावरणाला अधिक सुरक्षित करता येईल त्यासाठी दुसऱ्या प्रती प्रेम करण्याची भावना अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसऱ्याला मारून शिकार करण्यापेक्षा दुसऱ्याला जगवून एकंदरीतच आपला मानवीय वंश पृथ्वीवर सुरक्षित ठेवता येईल. 

स्वतः fit, शक्तिशाली असतानाही किंबहुना fit, शक्तिशाली असल्याचा फायदा घेत दुसऱ्याला मारून विध्वंस न करता दुसऱ्याला जगवून'निर्माण' करता आले पाहिजे. दुर्गम भागात आपल्या आरोग्यसेवांच्या माध्यमातून जीव वाचवणाऱ्या सर्च, निर्माण सारख्या संस्था आणि डॉक्टर अभय बंग कुटुंबीयांचे  कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

 शैलेश,जळगाव.


 कुठला आदर्श घेणार वरवर नायक वाटणाऱ्या "जिसकी लाठी उसकी भैस " म्हणणाऱ्या आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या पात्रांचं की, माणूस आणि जंगली हिंस्र प्राणी यातील फरक दाखवणाऱ्या करुणामयी मानवतावादाच.
 Video courtesy Aditi Tarde 
 
संदर्भ 
शोध आरोग्याचा - कार्यरत, मॅजेस्टिक प्रकाशन, १९९७ - अनिल अवचट
माझा साक्षात्कारी हृदयरोग, राजहंस प्रकाशन, २००२ - अभय बंग
खरेखुरे, युनिक फीचर्स, २००६ - संपादक: सुहास कुलकर्णी, लेख: श्रुती पानसे.
 आणि विकिपीडिया.




Thursday, 5 February 2026

'परीक्षा पे चर्चा '– विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा.

आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट ता धरणगाव जि जळगाव येथील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला.

आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेला 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम परीक्षांपुरता मर्यादित नव्हता, तर विकसित भारत २०४७ या स्वप्नाशी विद्यार्थ्यांना जोडणारा एक अत्यंत प्रेरणादायी संवाद होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत भारताच्या भविष्यातील वाटचालीत विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे ठामपणे अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, आजचा विद्यार्थीच २०४७ मधील विकसित भारताचा शिल्पकार आहे.

हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा जिंकण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे भविष्य आणि देशाचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रेरित करणारा ठरला.



Thursday, 29 January 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाठ येथे हुतात्मा दिवस साजरा.

 आज हुतात्मा दिनी  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट ता धरणगाव जि जळगाव येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.




Friday, 23 January 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथे आज दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना नेताजींच्या देशभक्ती, त्याग, शौर्य, आजाद हिंद सेनेचे योगदान तसेच “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा” या प्रेरणादायी घोषवाक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

त्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्भीड नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, मराठी अस्मितेचे रक्षण व त्यांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले.




Wednesday, 21 January 2026

जि.प. प्राथमिक शाळा फुलपाट येथे ' हिंद की चादर ' हा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम संपन्न.

 हिंद की चादर – राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाठ येथे “हिंद की चादर” या अत्यंत हृदयस्पर्शी व प्रेरणादायी राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांतर्गत  आज दिनांक २२ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शीख धर्माचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर सिंहजी यांच्या त्यागमय व प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित गीत ऐकवण्यात आले. सदर गीतातून सत्य, अन्यायाविरुद्ध लढा व बलिदानाची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गीत ऐकताना विद्यार्थी अत्यंत शांतपणे व भावनिकरित्या कार्यक्रमाचा अनुभव घेत होते.

कार्यक्रमप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू नामदेव पाटील तसेच उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ उपस्थित होते. गुरु तेग बहादूर सिंहजी यांच्या महान त्यागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व अशा राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र प्रेमाचे भावना अधिक दृढ झाली.

सदर कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.





Monday, 19 January 2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे महान योद्धे महाराणा प्रतापजी यांची पुण्यतिथी साजरी

 भारत मातेचे सुपुत्र, महान युद्धवीर महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फुलपाट येथे आज दिनांक 19 जानेवारी 2026, सोमवार रोजी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी शाळेतील उपशिक्षक श्री. शैलेश शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. त्यांनी आपल्या मनोगतातून महाराणा प्रताप यांच्या शौर्य, स्वाभिमान, स्वातंत्र्यप्रेम व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला. तसेच इतर शिक्षकांनीही त्यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

विद्यार्थ्यांनी शांत व शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धैर्य व आत्मसन्मानाच्या मूल्यांची जाणीव निर्माण झाली.