Saturday, 25 April 2026

बाल चित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा उत्साह उसळला, आनंदाची लाट पुन्हा हाऊसफुल्ल झाली.

 चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम - शिक्षणाधिकारी निलेश पाटील.

अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, पालक शाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. 

जळगाव (प्रतिनिधी) : चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे. या महोत्सवांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. बालवयातच उत्तम साहित्याची आणि कलेची आवड निर्माण होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.

'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सवाचा दुसरा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील उपस्थित होते. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुलांसाठी मटर पनीर, मंग्या , रिबेल आणि देवा तुला शोधु कुठे या ४ विशेष जागतिक दर्जाच्या बाललघूचित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेश पाटील यांनी मुलांशी संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. चिमुकल्यांच्या उत्साहाने भाऊंचे उद्यान परिसर बहरून गेला होता. 

प्रारंभी अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, पालक शाळेचे शैलेश शिरसाठ यांच्या हस्ते शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे रत्नाकर पाटील, डॉ.विद्या पाटील, शैलेश शिरसाठ, बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश शुक्ल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन व आभार बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले. यावेळी प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी गाणी व खेळांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधून त्यांना आज दाखविलेल्या चित्रपटांतील मूल्यांची माहिती दिली. 

बालचित्रपट सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी चित्रसाधनेचे कमलाकर रुगे, वर्षा उपाध्ये, पार्थ ठाकर, पालकशाळेचे डॉ. अनिल भोकरे, डॉ. वीणा महाजन, शैलेश शिरसाठ, डॉ. विशाखा पाटील, श्वेता जैन, मकरंद डबीर, अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्थ डॉ.श्रध्दा पाटील शुक्ल, अनघा गोडबोले, बालरंगभूमी परिषदेचे कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य आकाश बाविस्कर, मोहित पाटील, नाना सोनवणे, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतले.

उद्या बालचित्रपट महोत्सवाचा शेवटचा दिवस असून, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'शिवराज अष्टक' या मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपट मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि बुद्धिवान कामगिरीवर आधारित ‘रणपती : आग्र्याहून सुटका’ हा चित्रपट बालप्रेक्षकांना दाखविण्यात येणार आहे. तरी पालकांनी या चित्रपटाला आपल्या पाल्यांना घेऊन यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Friday, 24 April 2026

बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाल चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिक उपस्थित होते. खुल्या वातावरणात मोठ्या पडद्यावर चित्रपट प्रेक्षणाचा आनंद घेताना लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. चित्रपटातील संदेश, मनोरंजन आणि शिक्षण यांचा सुंदर संगम प्रेक्षकांना भावला. कार्यक्रमादरम्यान शिस्तबद्ध वातावरण राखले गेले आणि सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. एकूणच, महोत्सवाची सुरुवात अत्यंत यशस्वी ठरली.


बालचित्रपट महोत्सवातून बालकांमध्ये सामाजिक भान व कलेची आवड निर्माण होईल - महापौर दीपमाला काळे

जळगाव (प्रतिनिधी) : आजच्या डिजिटल युगात मुले मोबाईलमध्ये गुंतली आहेत, अशा वेळी त्यांना मानवी मूल्ये शिकवणारे चित्रपट दाखवणे आवश्यक आहे. या बालचित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मुलांमध्ये सामाजिक भान आणि कलेची आवड निर्माण होईल असा विश्वास महापौर दीपमाला काळे यांनी व्यक्त केला. अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव, बालरंगभूमी परिषद आणि रिफ्लेक्शन फाऊंडेशन संचलित पालकशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गंमत जंमत बालचित्रपट महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

 पाल्यांसोबत पालकांना देखिल आपले बालपण अनुभवता यावे या उद्देशाने जळगावात दि. २४, २५ आणि २६ एप्रिल असा तीन दिवसीय 'गंमत जंमत' बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन शहरातील भाऊंचे उद्यानात दररोज सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे.

उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अजिंठा फिल्म सोसायटीच्या विश्वस्त डॉ. श्रद्धा पाटील शुक्ल यांनी केले. महापौर दीपमाला काळे यांचे स्वागत आयोजकांतर्फे जयेंद्र लेकुरवाळे, विनोद ढगे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मनोगत व्यक्त करताना महापौर काळे यांनी भविष्यातही शहरात अशा उपक्रमांचे आयोजन केल्यास त्याला महानगरपालिका निश्चित सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा उपाध्ये यांनी केले. यावेळी व्यासपीठावर अजिंठा फिल्म सोसायटीचे सचिव विनीत जोशी,कोषाध्यक्ष डॉ. संजय हांडे, देवगिरी चित्र साधनेचे प्रांत संयोजक किरण सोहळे , पालक शाळेचे श्री. रत्नाकर पाटील ,डॉ.विद्या पाटील,शैलेश शिरसाठ,बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल उपस्थित होते.

उद्घाटनानंतर पहिल्या दिवशी दाखवण्यात आलेल्या ४थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधील सर्वोत्कृष्ट बालचित्रपट विजेती फिल्म 'शाळा सुटली' तसेच 'बेबीज डे आउट' या चित्रपटांना विद्यार्थ्यांनी उस्फुर्त दाद दिली. शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, जास्तीत जास्त मुलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



Thursday, 16 April 2026

 परीक्षा संपल्या आता मोठी सुट्टी सुरु…

अभ्यासामुळे टी.व्ही., पिक्चर सगळं राहूनच गेलंय तर मग

मुलांच्या सुट्टीच्या शुभारंभाला भन्नाट अनुभव देणारा,

जळगावात प्रथमच घेऊन येत आहोत

गंमत जंमत बालचित्रपट महोत्सव

पालक आणि पाल्य एकत्रित आपले बालपण अनुभवतील 

अश्या  दर्जेदार चित्रपटांची मेजवानी..

आजच आपल्या तारखा राखून ठेवा.

दि.२४,२५,२६ एप्रिल २०२६ रोज सायंकाळी ०६:०० वाजता.

स्थळ : भाऊंचे उद्यान, एम्फी थिएटर, जळगाव● प्रवेश : विनामूल्य.



Sunday, 12 April 2026

"एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..." असं गाणाऱ्या 'आशा' पुन्हा पुन्हा पल्लवीत व्हाव्यात पुन्हा पुन्हा जन्माव्यात या 'आशावादात'....

 हे परमेश्वरा,

काही वेळा तुझ्या अस्तित्व संदर्भात खूप चर्चा होतात  पण खरं सांगू का देवा तुझ अस्तित्व जाणवतं ते निसर्गतः,परिश्रमाने आपली कौशल्य विकसित केलेल्या कलाकाराच्या कलाकृती पाहिल्या ऐकल्यावर.
देवा तुझ्या अस्तित्वाचा भास होतो गायकांच्या सुरेल गायनातून आणि प्रत्यक्ष निर्जीव असणाऱ्या वाद्यांना दैवी जीवत्व देणाऱ्या कलाकारांच्या कलाकृतीतून...किंबहुना आपल्याकडे असलेल्या कलागुण आपण गेल्यानंतर या जगाला देऊन जातो ही कृती, ही भावना,विचार तुझं अस्तित्व शाश्वत असल्याचं सांगत असतात...
आपल्या गायनाने जगाला बेधुंद होऊन जगणं शिकवणाऱ्या गायिका आशा भोसले यांनी या ईहलोकात अखेरचा श्वास घेतला असला तरी त्यांची गायकी,  श्वास आणि स्पंदन होऊन अजरामर  झाली आहे.

पुनर्जन्म असतो नसतो मला माहीत नाही पण "एकाच ह्या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी..." असं गाणाऱ्या  आशा पुन्हा पुन्हा पल्लवीत व्हाव्यात पुन्हा पुन्हा जन्माव्यात या आशावादात.... - शैलेशकमल





Friday, 10 April 2026

महात्मा ज्योतिराव फुले जन्मद्वीशताब्दी वर्ष २०२६-२७

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट येथे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी.

शिक्षणतज्ञ, कृषीतज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, प्रकाशक, आद्य शिवचरित्रकार, आधुनिक नाटककार, वक्ते, मराठी कवितेचे जनक, समाजसुधारक, पुण्याचे नगरसेवक , सामाजिक कार्यकर्ते, ख्यातनाम उद्योगपती अशा अनंत पैलूंची नाममुद्रा तात्यासाहेबांनी समाजमनावर उमटवली. त्यांच्या जन्मद्वीशताब्दी निमित्त चालू वर्षात अशा पैलूंवर प्रकाश टाकणे तसेच त्यांच्या प्रखर कार्याविषयी व्याख्यानातून लोकजागृती करणे महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच क्रांतीज्योती सावित्रीआई फुले  यांच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली.

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन.🙏



Friday, 3 April 2026

My Movie My Motivation. चित्रपटांवर बोलू काही...

 शाळेत शिकवले जाणारे धडे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसतात, तर ते अनुभवातून अधिक प्रभावीपणे मनावर कोरले जातात. अलीकडेच आमच्या शाळेत मुलांना पाणी वाचवण्याच्या महत्त्वावर आधारित एक शॉर्ट मूवी दाखवण्यात आली आणि त्या अनुभवाने मुलांच्या मनावर खोल परिणाम केला.

ही शॉर्ट मूवी अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने तयार केली होती. सुरुवातीला एका गावात पाण्याची कमतरता कशी निर्माण होते, लोकांना कशा अडचणींना सामोरे जावे लागते, आणि पाण्याचा अपव्यय कसा संकटात बदलतो हे दाखवले होते. पुढे त्याच गावातील काही मुले आणि नागरिक एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी छोटे-छोटे उपाय कसे करतात,जसे की नळ बंद ठेवणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे हेही खूप सुंदरपणे सादर केले होते.

मुलांनी हा चित्रपट अत्यंत लक्षपूर्वक पाहिला. चित्रपटातील दृश्ये, संवाद आणि भावनिक प्रसंग यामुळे ते पूर्णपणे त्या कथेत गुंतून गेले.या अनुभवातून मुलांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर त्यांच्या विचारांमध्येही बदल दिसून आला. चित्रपटानंतर घेतलेल्या चर्चेत मुलांनी स्वतःहून अनेक उपाय सुचवले.घरात पाणी वाया जाऊ देणार नाही, दात घासताना नळ बंद ठेवणार, आई-वडिलांनाही पाणी जपून वापरण्यास सांगणार इत्यादी. काही मुलांनी तर आपल्या घरात पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्या तयार करण्याची कल्पनाही मांडली.

शिक्षक म्हणून हा अनुभव अत्यंत समाधानकारक होता. कारण मुलांनी केवळ पाहिले नाही, तर ते समजून घेतले आणि त्यावर कृती करण्याची तयारीही दाखवली. अशा प्रकारच्या शॉर्ट मूवीजमुळे शिक्षण अधिक जिवंत आणि परिणामकारक बनते.

आजच्या काळात पाणी ही एक अमूल्य संपत्ती आहे. “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश मुलांच्या मनात रुजवणे खूप आवश्यक आहे. आणि अशा प्रभावी माध्यमांद्वारे दिलेला संदेश नक्कीच दीर्घकाळ टिकतो.




Wednesday, 11 March 2026

जि.प.प्राथमिक शाळा फुलपाट येथे यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

 यशवंतराव चव्हाण जयंती उत्साहात साजरी

दिनांक १२ मार्च २०२६, गुरुवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलपाट, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व थोर नेते यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनकार्याची व त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यांनी शिक्षण, सहकार, शेती व समाजकारण या क्षेत्रांत दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली व त्यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श विचारांचे पालन करण्याचा संकल्प केला. अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.


 कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन करण्यात आली. शाळेत पूर्वीपासून स्थापन असलेल्या We Smart या शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या ग्रुप च्या माध्यमातून पर्यावरण रक्षणा बाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे.