Tuesday 27 February 2024

राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या 'मंगलमय' 🙂 शुभेच्छा.

 सन्माननीय प्रभारी मुख्याध्यापक 

आपल्या शाळेची शैक्षणिक (?) सहल मंगळ ग्रह मंदिरावर जाऊन आली. शैक्षणिक सहलीचा उद्देश विद्यार्थ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव घेऊन काही नवीन गोष्टी शिकता याव्यात तसेच मौज मजा मस्ती करून आनंददायी अनुभव घेता यावा असा असावा किंबहुना तो तसाच आहे हे आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सांगावंस वाटतं.

आपल्या शाळेची सहल मंगळ ग्रह मंदिरावर गेल्यावर त्या स्थळाबद्दल काय बोध घेतला असणार ? तिथे होणाऱ्या कर्मकांडांबद्दल काय सांगणार? मंदिराच्या गेट वर लिहिले आहे की, ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा याचा अर्थ आपल्या हाती काही नसून ग्रहांच्या स्थितीनुसार आपल्या नशिबात जे लिहिल आहे तेच होईल.पण ग्रहांच्या स्थितीनुसार नेमकं काय लिहिल आहे हे परफेक्ट सांगणारी यंत्रणा कुठे आहे हेही कळायला मार्ग नाही. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह नेमक काय म्हणतो आणि आकाशातील ग्रहताऱ्यांनुसार आपले भविष्य शोधण्याचा प्रयत्न केला असता, विविध ग्रहांच्या शांती करत नशिबावर अवलंबून राहण्याचा अंधश्रद्धाळूपणा केला असता तर स्वराज्य निर्माण केले नसते .'ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा' असा अविवेकी,अंधश्रद्धाळू विचार जर जिजाऊंनी आणि शिवबांनी केला असता आणि सर्व कार्यभार आकाशातील ग्रह, ग्रह शांत करणाऱ्या कर्मकांडात  आणि परमेश्वरावर सोडून दिल असतं तर दैदीप्यमान इतिहास घडला नसता म्हणून चिकित्सकपणे विचार करा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की खरंच ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा ? हेही आवर्जून लक्षात ठेवा की आपला महाराष्ट्र हा शाहू- फुले-आंबेडकरांच्या विचारसरणीचा पुरोगामी महाराष्ट्र आहे.


विद्यार्थ्यांपुढे  शाळेतून  वैज्ञानिक दृष्टिकोन मांडला गेला पाहिजे कारण आपली भारतीय राज्यघटना आपल्याकडून खालील अपेक्षा व्यक्त करते त्या अशा 👇

(There is one duty that is unique to India under Article 51A (h) 'It is a duty of every Indian citizen to promote scientific temperament, spirit of enquiry, spirit of reform and unionism'. म्हणजे👉

'शोधकबुद्धी,धर्मसुधारणा मानवतावाद याचा विचार प्रसार आणि अंगीकार करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. आपण सर्वांनीच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावला पाहिजे.✍

विद्यार्थी हा विविध सामाजिक घटकांकडून (समाजातून) विविध समाज माध्यमातून,दूरचित्रवाणीवरील भाकड कथांमधून  खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा घेऊनच शाळेत येत असतो. कारण विद्यार्थी हा शाळेच्या चार भिंती बाहेर समाजाकडून खूप काही चांगल आणि वाईटही  शिकत असतो. अशा वेळेला विद्यार्थ्यांना शाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन जर शिकवला गेला नाही तर आपण खूप मोठी चूक करत आहोत असं मला व्यक्तीशः वाटतं. व्यक्तीला उपासना आणि कर्मकांड करण्याचा अधिकार जरी असला तरी शाळेसारख्या ठिकाणी जिथे वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी असतात तिथून कोणत्याही अंधश्रद्धांनी युक्त कर्मकांड होणार्‍या अवैज्ञानिक स्थळाला शैक्षणिक सहलीच्या नावाने भेट देणे कितपत योग्य आहे ? याचा जबाबदार सुशिक्षित नागरिक म्हणून विचार होणं देखील महत्त्वाच आहे.

राज्यघटनेने सांगितलेल्या आपल्या कर्तव्यांना मुठ माती देऊन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या सुलभक आणि मार्गदर्शकाच्या भूमिकात असणाऱ्यांनी भान ठेवणे अत्यावश्यक आहे.राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या 'मंगल'मय🙂 शुभेच्छा.✍️शैलेश 




Sunday 18 February 2024

प्रिय नातवंडांनो...
उद्या शिवजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार आहे त्यानिमित्ताने हा पत्र प्रपंच...
भविष्यात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल मत प्रदर्शित करणार असाल किंवा लहान मोठ्या सभेमध्ये व्याख्यान देणार असणार तर हे लक्षात ठेवा की,
शिवरायांचा लढा रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तांविरोधात होता हे मांडण्यााच भान म्हणजे 'शिव व्याख्यान'...
आणि
नफरतो के बाजार मोहब्बत की दुकान... म्हणजे
'शिव व्याख्यान'. या अर्थाने सार्वजनिक शिवजयंती उत्सवात तुम्ही शिवरायांच्या मानवतावादी कल्याणकारी राज्याची भूमिका मांडली पाहिजे.
शिवरायांचा लढा कुण्या धर्माशी किंवा जातीशी नव्हताच तर शिवरायांचा लढा सर्वसामान्य कष्टकरी रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या जुलमी सत्तां विरुद्ध होता.
शिवरायांचा लढा हा मानव कल्याणकारी राज्यासाठी होता,ज्यात कुठलाही भेदभाव न करता सर्वसामान्य गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी,शेत मजुर सर्वांनाच त्यांचं स्वतःचं स्वराज्य निर्माण करून देणारा,धर्म आणि जात निरपेक्ष लढा होता.
इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या. म्हणून शिवरायांचा वकील जन्मानं मुस्लिम असणारा काझी हैदर होता आणि अफजलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता,ज्याने अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर तलवारीने हल्ला केला होता.त्याचवेळेस जीवा महालाने अफजलखानाचे सहकारी सय्यद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी चा देखील वध केला.
औरंगजेबाच्या मुघल साम्राज्यशाहीकडून लढणारा औरंगजेबाचा सर्वात महत्त्वाचा साथीदार मिर्झाराजा जयसिंग होता.
शिवरायांचा लढा हा मानवी मूल्यांचा लढा होता म्हणूनच शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती धर्माचे लोक होते. शिवराय आणि रयत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. त्यांच्या नौसेनेतील प्रमुख सैनिक अधिकारी सिद्धी संभल,सिद्धी इब्राहीम (आरमार प्रमुख) मुस्लिम होते.
शिवरायांचे चित्र सर्वप्रथम मीर मोहम्मद या चित्रकाराने काढले शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आणि गायला तर दुसरा पोवाडा शाहीर अमर शेख या मुस्लिम शिवशाहीराने गायला.
शिवरायांचा तोफखाना सांभाळणारा शिवरायांवर जीवापाड प्रेम करणार त्यांचा सहकारी इब्राहिम खान होता जो बाजीप्रभू देशपांडे,तानाजी मालुसरे यांच्या सारखा स्वराज्यासाठी प्राणप्रणाने लढत होता.
अठरापगड जातींना सोबत घेणारे शिवराय जात-पात धर्म असा भेद मानत नव्हते म्हणूनच त्यांच्या अंगरक्षकांमध्ये येसाजी कंक,कोंडाजी कंक, संभाजी कावजी,काताजी इंगळे, कृष्णाजी गायकवाड,सुरज कांडके, जीवा महाला,विसाजी मुरंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम देखील होता.
शिवरायांचा पहिला सरनौबत नुरखान बेग हा होता. शिवरायांना अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे अशी खबर देणारा आणि शिवराय अफजल खानाला भेटीला जाणार म्हणून सतत काळजी करणारा,शिवरायांना वाघनखे बनवून देणारा रुस्तुमे जमान या धर्मानं मुस्लिम असणाऱ्या शिवरायांच्या मित्राला विसरून कसे चालेल?
पन्हाळगडावरील सिद्धी जोहरच्या वेढ्यातून शिवरायांना विशालगडाकडे सुखरूप पोहोचवण्यासाठी शिवा काशिद ने आपले बलिदान दिले.हुबेहूब शिवाजी महाराजां सारखाच दिसणारा शिवा काशिद न्हावी होता. आपण मेलो तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा असणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे वाचले पाहिजे म्हणून त्याने आपल्या प्राणाची आहुती दिली.
शिवरायांच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि सचिव हैदर अली होते. आग्र्याहून सुटकेच्या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून "राजे आम्ही मेलो तरी चालेल पण स्वराज्यासाठी तुम्ही फार महत्त्वाचे आहात"असं म्हणणारे मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद यांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान खूप महत्त्वाचे आहे.
शिवरायांच्या सैन्यात सातशे मुस्लिम पठाण होते. शिवरायांचे दुसरे गुरु सुफी संत याकूब बाबा होते. शिवरायांनी आपल्या सैन्यांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना आपल्या आज्ञापत्रातून केल्या होत्या जसे की मोहिमेवर जात असताना शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेताच्या कडेकडेने जावे उभ्या पिकांमधून जाऊ नये.असे कुठलेही कृत्य करू नये की ज्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतीमालाचे नुकसान होईल.
शिवराय आपल्या आज्ञापत्रात म्हणतात शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला देखील स्पर्श करू नये. कुठल्याही जाती धर्माचे असो त्या सर्व महिला,लहान मुलांची अधिक काळजी घ्यावी.
या खेरीज शिवरायांनी आपल्या आज्ञापत्रातून आपल्या सैनिकांना हेही सांगितले की कुराणाची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक आपल्या मुस्लिम बांधवांकडे सुपूर्त करावी तिचा अवमान करू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सर्वप्रथम साजरा करणारे क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले शिवरायांचा उल्लेख कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज असा अगदी यथार्थ करतात.
रयतेचे जाणते राजे शिवराय हे छत्रपती झाले कारण स्वराज्यासाठी प्रतापराव गुजर,कोंडाजी फर्जंद,सूर्यराव काकडे, कान्होजी जेधे,फिरंगोजी नरसाळा, रामजी पांगेरा, हिरोजी इंदुलकर,दौलत खान,वेंटाजी भाटकर, मायनाक भंडारी,तुळाजी आंग्रे, सिद्धी मिस्त्री कान्होजी आंग्रे अजिंक्यतारा झुंजणारे प्रयागजी प्रभू बाजी पासलकर मुरारबाजी नेताजी पालकर आणखी असंख्य अशा लढवय्या मराठ्यांची साथ होती.(या ठिकाणी मराठा जात नाही तर समूह किंवा मराठा समाज ज्यात असंख्य मराठी अमराठी जाती आहेत या अर्थाने)
एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण समाजात विविध धार्मिक आणि जातीय बाबींमुळे तेढ निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अफवांवर आपण विश्वास ठेवायला नको कारण अनेकदा सत्तेच्या लढायांना धर्माच्या लढाया दाखवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जातो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास केल्यास हे लक्षात येते की इतिहासातील लढाया ह्या प्रामुख्याने धर्मासाठी नसून सत्तेसाठी होत्या.
थोडक्यात देशात शांततामय,बंधूभावाचे, सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या समाज माध्यमांचीही मोठी जबाबदारी आहेच. अर्थात या ठिकाणी समाज माध्यम म्हणजे ती तांत्रिक उपकरणे नव्हे , तर अशी तांत्रिक उपकरणे हाताळणारी 'हातं' या अर्थाने आहे. जबाबदार नागरिक आणि समाज शिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रहितास प्रथम प्राधान्य द्यावे, त्याची गरज सर्वाधिक आहे. बाकी इतर सारांश पुढील पत्रात मांडणारच आहे तोपर्यंत हे विसरू नका आपलं समाजाशी एकमेकांशी असलेलं नातं हे आई आणि लेकराच्या नात्यासारखं पवित्र असू द्या आणि म्हणूनच त्यासाठी हे सांगावेसे वाटते की,
तुमचं आमचं नातं काय..?
🚩जय जिजाऊ जय शिवराय.🚩
तुमचा आजोबा
शैलेश✍️