शाळेत शिकवले जाणारे धडे फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसतात, तर ते अनुभवातून अधिक प्रभावीपणे मनावर कोरले जातात. अलीकडेच आमच्या शाळेत मुलांना पाणी वाचवण्याच्या महत्त्वावर आधारित एक शॉर्ट मूवी दाखवण्यात आली आणि त्या अनुभवाने मुलांच्या मनावर खोल परिणाम केला.
ही शॉर्ट मूवी अतिशय साध्या पण प्रभावी पद्धतीने तयार केली होती. सुरुवातीला एका गावात पाण्याची कमतरता कशी निर्माण होते, लोकांना कशा अडचणींना सामोरे जावे लागते, आणि पाण्याचा अपव्यय कसा संकटात बदलतो हे दाखवले होते. पुढे त्याच गावातील काही मुले आणि नागरिक एकत्र येऊन पाणी वाचवण्यासाठी छोटे-छोटे उपाय कसे करतात,जसे की नळ बंद ठेवणे, पावसाचे पाणी साठवणे, झाडे लावणे हेही खूप सुंदरपणे सादर केले होते.
मुलांनी हा चित्रपट अत्यंत लक्षपूर्वक पाहिला. चित्रपटातील दृश्ये, संवाद आणि भावनिक प्रसंग यामुळे ते पूर्णपणे त्या कथेत गुंतून गेले.या अनुभवातून मुलांना केवळ माहितीच मिळाली नाही, तर त्यांच्या विचारांमध्येही बदल दिसून आला. चित्रपटानंतर घेतलेल्या चर्चेत मुलांनी स्वतःहून अनेक उपाय सुचवले.घरात पाणी वाया जाऊ देणार नाही, दात घासताना नळ बंद ठेवणार, आई-वडिलांनाही पाणी जपून वापरण्यास सांगणार इत्यादी. काही मुलांनी तर आपल्या घरात पाणी साठवण्यासाठी छोट्या टाक्या तयार करण्याची कल्पनाही मांडली.
शिक्षक म्हणून हा अनुभव अत्यंत समाधानकारक होता. कारण मुलांनी केवळ पाहिले नाही, तर ते समजून घेतले आणि त्यावर कृती करण्याची तयारीही दाखवली. अशा प्रकारच्या शॉर्ट मूवीजमुळे शिक्षण अधिक जिवंत आणि परिणामकारक बनते.
आजच्या काळात पाणी ही एक अमूल्य संपत्ती आहे. “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा संदेश मुलांच्या मनात रुजवणे खूप आवश्यक आहे. आणि अशा प्रभावी माध्यमांद्वारे दिलेला संदेश नक्कीच दीर्घकाळ टिकतो.

No comments:
Post a Comment