Sunday, 31 August 2025

कुठून...? The Folk आख्यानाच्या आख्यानातून...

थाट हा जुना खेळ हा नवा कुठून...? The Folk आख्यानाच्या आख्यानातून...
"थाट हा जुना खेळ हा नवा" असं म्हणत आपलीच लोककला माहीत नसणाऱ्या आणि विसरू पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अस्सल झणझणीत गावरान अंजन घालणारा तरुणांचा कार्यक्रम म्हणजेच The Folk आख्यान. 

 दर कोसाला वेगवेगळ्या भाषा आणि लेहजांनी समृद्ध असलेल्या मराठी मुलुखात महाराष्ट्राच्या लोकधारेच्या लोकगीतांची,पारंपारिक वाद्यांची ओळख नवीन पिढीतील तरुण The Folk आख्यानाच्या माध्यमातून करत आहेत. हल्ली नवीन पिढीवर सातत्याने टीका होताना आपण पाहतो परंतु नवीन पिढीत प्रचंड क्षमता आणि कौशल्य आहेत  जुन्या पिढ्यांसह सर्वच पिढ्यांनी मात्र स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मासाहेब, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा अंगावर शहारे आणणारा दैदिप्यमान इतिहास फुले,शाहू,आंबेडकर यांच्या प्रबोधनातून हस्तांतरित करत राहावा. हेे सर्व होत असताना सर्व वयोगटाच्या मराठी माणसांना जोडणारा आपल्या सर्वांच्या हृदयातील महत्त्वाचा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नावाचं स्पंदन आणि रुबाब.
 The Folk आख्यानाच्या माध्यमातून आपण सर्वांनीच हे अनुभवलच पाहिजे. विशेषतः हा कार्यक्रम लहान मुलांना दाखवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.मराठी लोकसंगीताची श्रीमंती अधोरेखित करणारं मराठी मातेचं आणि मातीचं आख्यान नक्की बघाव सतत बघत राहावं असंच आहे.
अंगावर शहारे आणणाऱ्या, रक्तात सळसळ निर्माण करणाऱ्या ,बेधुंद मनाच्या लहरींवर स्वार करणाऱ्या एकूणच निसर्गानं मानवाला दिलेल्या सर्व भावभावनांच्या क्षणांचे वाटेकरी होण्यासाठी The Folk आख्यान अगदी समर्पक आहे.
यातील सर्व गाणी, आणि अख्यानाच लेखन, सूत्रसंचालन युवा लेखक ईश्वर अंधारे (लमाणबंधू) यांनी लिहिलेली असून कंपोझिंग, संगीत आहे राऊत आणि विजय कापसे यांचं मुळात आख्यानाची ही संकल्पनाच हर्ष आणि विजय यांची आहे. तरुणांच्या या टीमनं स्वतःच अस्सल, युनिक अस केल अफाट आख्यान मांडलं आहे. कुठेही पूर्वी कोणी दुसऱ्याने गायलेल, संगीतबद्ध केलेल गाणं नाही सगळं काही अगदी Self Made. आख्यानाला ८० पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून संगीताचा साज शृंगार उपस्थिथितांना बेफाम होऊन ठेका धरायला लावतो.विशेष बाब म्हणजे या सर्व कलााावंत तरुणांचं वय कमी आहे सरासरी फक्त २५ असेल, या स्टेजवर जरी २५ कलावंत दिसत असले तरी बॅकस्टेजचे सहकारी मिळून एकूण ४० तरुण कलावंत आहेत. यांचा प्रत्येकच शो हा घोषित झाल्यावर लगेचच हाउसफुल होतो.

 आपली लोककला किती समृद्ध आणि प्रचंड उत्साह, उमेद देणारी ऊर्जा आहे हे अनुभवण्यास मिळेल. या कार्यक्रमाचे गारुड आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील असा काहीसा अनुभव घेऊया.The Folk आख्यानाच्या उत्साहित तरुणांना साद घालूया ही साद केवळ तरुणांना नाही तर महाराष्ट्राच्या लोकधारीलाच असेल.

 पुण्यात पुस्तक महोत्सवात The Folk Akhyan च्या टीमने विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केले. या टीमचा युवा शाहीर चंद्रकांत माने यांच्या सुमधुर आवाजात गायलेले प्रेरणादायी गीत "शिवबा राजं छत्रपती झालं ग" तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाची आणि गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतं. या गाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच आणि त्यागाच उत्तम वर्णन आहे. चला तर मग तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय‌ म्हणत स्फूर्तीदायी गीत (घाटोळी) ऐकूया !
✍️ शैलेश शिरसाठ,जळगाव.


🙏Special Thanks Amazing Memories
Fergusson College Pune.🙏
And factsforindia
घाटोळी लोकगीताचा महाविद्यालयीन तरुणाईस सोबतचा पूर्ण व्हिडिओ पहा दोन्ही चॅनेल सबस्क्राईब  करा. 👇





Thursday, 21 August 2025

 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन

दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी ता. धरणगाव, जि. जळगाव येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात प्रामुख्याने “समावेशक भविष्यासाठी वृद्धांच्या आवाजांना सक्षम बनवणे” हा संदेश अधोरेखित करण्यात आला. शाळेचे शिक्षक श्री. भटू पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना आजी-आजोबांविषयी जिव्हाळा व आपुलकी निर्माण करणारी एक बोधकथा सांगितली. या बोधकथेतून वृद्धांचे अनुभव, ज्ञान व त्यांच्या मार्गदर्शनाचे आपल्या जीवनातील महत्त्व समजावून देण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रश्नोत्तरांचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे आपल्या आयुष्यातील स्थान, त्यांच्याशी असलेले नाते व त्यांच्यावरील कृतज्ञता अधिक दृढ केली.

शाळेचे मुख्याध्यापक प्रेमलाल पाटील ज्येष्ठ शिक्षिका वंदना ताई पाटील  श्री विश्वास पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती छायाताई घुगे यांनी केले

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा तसेच एकंदरीत शाळेचा महत्त्वाचा वाटा राहील यावर भर देण्यात आला. यासाठी शाळा स्तरावर देखील विशेष प्रयत्न केले जात आहेत.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वृद्धांबद्दल सन्मान, आपुलकी व कृतज्ञतेच्या भावना वृद्धिंगत झाल्या. अशा प्रकारे शाळेत जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन शैक्षणिक व मूल्याधिष्ठित वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.


Wednesday, 20 August 2025

 आटपाट नगर होते अर्थातच त्या नगरात एक राजा होता. 

एके दिवशी राजा दुसऱ्या राज्याच्या दौऱ्यासाठी निघाला राजासोबत प्रधानाचे जाणंही आवश्यक असल्यामुळे दौऱ्यावर राजाने प्रधानाला देखील घेतले आणि राजा शेजारच्या राज्यात दौऱ्यासाठी गेला. जातांना राजाने त्याचा खाजगी सेवक असणाऱ्या म्हणजे राजाचे हातपाय दाबून देणाऱ्या महादू नावाच्या एका शिपाई सेवकाला राजाच्या गृहावर (घरावर) वर लक्ष ठेवायला सांगितले थोडक्यात त्याला राजाच्या स्वतःच्या Home चे guard बनवले  जेणेकरून राजा परत आल्यावर राजाला काही माहिती कळू शकेल. 

परंतु झालं भलतंच होम चा गार्ड असलेल्या शिपायाला आपण राज्याचे प्रमुख आहोत असं वाटू लागले आणि तो प्रत्येक सैनिक आणि राजदरबारातील कर्मचाऱ्यांशी अरेरावीने वागू लागला तो कधीही कोणाशी प्रेमाने बोलत नव्हता तर राज्याचा खूपच मोठा अधिकारी असल्याच्या अविर्भावात प्रत्येकाला दरडावून बोलत असे. त्याच्या अशा वागण्यामुळे, अर्वाच्य भाषेतील अश्लाघ्य,उर्मट वागण्या बोलण्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे देखील मानसिक स्वास्थ्य बिघडू लागले होते आणि त्याचा विपरीत परिणाम अर्थातच त्यांच्या कामावर आणि राज्याच्या विकासावर विपरीतपणे झाला होता.

 राजा आपला दौरा आटपून पुन्हा राज्यात हजर झाले. राजा जसे आले तसे राजाने त्याचा सेवक असणाऱ्या महादू सेवक शिपायाने प्रत्येकाची कंप्लेंट करायला सुरुवात केली की, राज्यात कोणीच काम करत नाही असं म्हणत त्याने राजाच्या दरबारातील विशेष सैनिकांना बोलावले आणि राजासमोरच तो त्या दोन्ही सैनिकांना बोलू लागला तो एवढ्यावरच न थांबता त्याने एक चाबूक काढला होता आणि त्याने सांगितलं की राजे हा चाबूक घ्या आणि यांचे सालपटे काढून टाका. नाहीतर मग मीच यांना सरळ करतो. राजा त्या होमगार्ड महादूला म्हणाला अरे "महादू किती बोलतो, केवढ्या तावातवाने बोलतो जरा शांत हो आणि तू तर मलाच आदेश द्यायला निघालास आणि मला न विचारता तू चाबूक देखील आणून ठेवला आहेस या दोन्ही शिपायांना मारण्यासाठी." यावर महादू पुन्हा महाराजांनाच म्हणाला "महाराज हे दोनच नाही आणखी बरेच आहे आणि हो या दासीला पण चांगल चापकांनी फोडून काढा."महाराज महादू सेवकास म्हणाले ,"अरे पण मी तुला महिला कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं नव्हतं तरी देखील तू ते काम केलस. अरे महादू तोंड धु, केवढा बोलतोस अक्षरशः फेस आला तुझ्या तोंडाला.

अरे तू मलाच आदेश देतोय यांना शिक्षा करण्याची. मला तर एक वेळ वाटायला लागलं की मी या राज्याचा राजा आहे की तू? खरं म्हणजे तू पोलीस शिपाई देखील नाहीस तू केवळ एक सेवक आहेस.तुझा गार्डचा आणि शिपायाचा ड्रेस सारखा असल्यामुळे तुला तसा भास होतो आणि त्या भासातून काहीही वागून जातोय."

राजाने असे ठणकावून सांगितल्यावर देखील महादू पुन्हा दोन दिवसांनी राजाकडे गेला. आणि त्या शिपायांच्या आणि दासीच्या शिक्षा विषयी राजाला आठवण करून देऊ लागला तेव्हा राजा म्हणाले,"अरे मी दोन दिवसापासून बघतोय ही सगळी मंडळी तर खूप छान काम करत आहेत,अरे महादू मी ज्यावेळेला राज्याचा नेतृत्व करतो त्यावेळेला त्यांच्यावर हुकूम गाजवण्यासाठी नाही तर त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना कामात मदत करण्यासाठी नेतृत्व करतो त्यांना जीव लावतो म्हणून ते देखील मला जीव लावतात आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी त्यांच्याकडूनही चूक होऊ शकते पण हा मानवी स्वभाव आहे थोड्या बहुत चुका आपण सारेच करतो रे, म्हणून काय प्रत्येक वेळेला चाबूक हातात घ्यायचा असं नसतं. अरे आपण शिवजयंती दरवर्षी साजरी करतो पण शिवाजी महाराजांचा नेतृत्वाचा हा गुण आपण घ्यायला पाहिजे की आपण आपल्या सोबत काम करणारा स्वराज्याचा प्रत्येक शिलेदार आपल्या सोबत काम करणार आहे असं मानलं पाहिजे आपल्या हाताखाली काम करणार आहे असं मानलं तर मग आपण हुकुमशहा होतो आणि शिवरायांनी हेच टाळलं सहकाऱ्यांसोबत आपल्या ताटात जेऊ घातलं त्यांना जीव लावला,प्रेम लावलं त्यामुळे ती स्वराज्यासाठी मरायला देखील तयार झाली.

अरे महाद्या , मी तुला दोन दिवसासाठी गृह शिपाई काय बनवलं तू तर हुकुमशहा झाला नेतृत्व करण्याची तुझी मुळीक क्षमता नाही हे माझ्या उशिरा का होईना लक्षात आले."

आता राजा दोन दिवसाच्या दौऱ्यावर गेल्यावर त्या दुसऱ्या राज्यात त्याला काय अनुभव आला ते पुढच्या कथेत अवश्य वाचा.   ......................

बोधकथा (टीप- बोध घेतल्यास बोधकथा अन्यथा अहिराणी बोलीनुसार... बोध कथा? )

 नेहमीप्रमाणेच आटपाट नगर होते त्या नगरात अर्थात एक राजा होता.राजा असल्यामुळे सैन्य, सेनापती, स्तुतीपाठक असा सगळा लवाजामा होता.

गावाकडच्या किल्ल्यातून खाली उतरण्यासाठी सैनिकांनी दोराने उतरावे किंवा पायऱ्यांची व्यवस्था करावी अशी चर्चा सैनिकांमध्ये सुरू होती.

  सेनापती सैनिकांना म्हणाला की, किल्ल्याच्या तटबंदीवरून खाली जाण्यासाठी उड्या मारा कारण तुम्ही शूर सरदार आहात त्यावर एका अभ्यासू चिकित्सक सैनिकाने सेनापती या कार्यालयीन प्रमुखाला सांगितले की, त्यामुळे हाता पायाला दुखापत होऊ शकते किंवा प्रसंगी जीव देखील जाऊ शकतो. त्यावर हुशार सेनापती स्मित हास्य करीत म्हणाला की,"सैनिकांनो नकारात्मकता सोडा सकारात्मक विचार करा.तुम्ही असा नकारात्मक विचार का करतात की वरून उडी मारल्यानंतर काही दुखापत होऊ शकते किंवा जीव देखील जाऊ शकतो त्याऐवजी असा विचार करा की वरून उडी मारल्यावर मला काहीही होणार नाही,मी सही सलामत उडी मारून सुखरूप राहू शकतो. 

त्यावर आपल्या कार्यालयीन प्रमुख असणाऱ्या सेनापतीची स्तुती करत दुसरा सैनिक म्हणाला,"बरोबर आहे सेनापती साहेब, आपण खूपच बुद्धिमान आहात, शूर आहात आपणच हे प्रात्यक्षिक ह्या कमी समज असणाऱ्या सैनिकांना करून दाखवावे असे ऐकताच 56+1 म्हणजेच 57 इंची छाती झालेल्या सेनापतीने अत्यंत सकारात्मक वृत्तीने खाली उडी मारली आणि....

सेनापतीची स्वर्गातील उर्वशीचे नृत्य पाहण्याच्या सकारात्मक इच्छेसाठीचे एक पाऊल नव्हे तर अख्खी उडीच सार्थक झाली.

विद्यार्थ्यांच्या अंगी निसर्गत: असलेली जिज्ञासावृत्ती जोपासण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून शोधक वृत्तीने शोध घेण्याची सवय लागली पाहिजे यासाठी.

विज्ञान उपक्रम

*'असे का होते?'* 🤔 हा वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी उपक्रम राबवत असताना सुप्रसिद्ध सिने कलावंत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक जबाबदार नागरिक आणि विचारवंत सन्माननीय मार्गदर्शक किरण माने सरांचा हा छोटा  लेख साभार पोस्ट करत आहे.*  👇                     

       चार्वाक, प्राचीन भारतातला पहिला समाजसुधारक... त्याच्या बायकोच्या लक्षात येत नव्हतं की नवरा नेमकं का करतोय हे काम? "आपला नवरा उगीचंच लोकांना 'बुद्धी वापरा, अंधविश्वास ठेवू नका' असं सांगत फिरतोय. चमत्कार म्हणून कायतरी असतं की.. जुनीजाणती माणसं काय येडी हायेत का?" असं तिचं म्हणनं होतं. एका मध्यरात्री चार्वाकानं आपल्या बायकोला गावच्या वेशीजवळ नेलं. तिथनं धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातल्या चौकापर्यंत आला. नंतर दोघंबी घरी गेले...


...दुसर्‍या दिवशी सकाळी तो पुन्हा बायकोला घेऊन चौकात आला. धुळीतल्या खुणा बघून गांवातली लोकं एकमेकांत चर्चा करायला लागलेवते. एका बुजुर्गानं सांगीतलं."हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत." सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. 'रात्रीच्या वेळी लांडगा येतोय', अशी अफवा पंचक्रोशीतल्या घराघरात पसरली.


...हे सगळं चार्वाक आणि त्याची बायको यांच्यासमोर घडलं. चार्वाकानं बायकोला विचारलं, "या धुळीत हे काय आहे ?" ती म्हणाली, 'हे तुमच्या हाताचे ठसे आहेत !” तो म्हणाला, “कायतरीच काय? गांवच काय अख्खी पंचक्रोशी म्हणतीय, हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.. ते काय वेडे आहेत का?" यावर ती म्हणली, “पंचक्रोशीतल्याच काय, सगळ्या जगातल्या लोकांनी येऊन मला तसं सांगितलं, तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे." 

चार्वाक म्हणाला, "मग इतकी वर्षं मी तरी लोकांना दुसरं काय करायला सांगतोय ?"

...विवेकी विचार म्हणजे काय? याचं याहून चांगलं उदाहरण नाय माझ्या भावांनो. विवेकी माणूस ऐकलेली गोष्ट नीट पडताळून पाहून,परीक्षा करून मग खरं-खोटं, योग्य-अयोग्य ठरवतो. मुर्ख माणूस दुसरा सांगेल ते ऐकून आंधळा विश्वास ठेवतो.


आज आपण सगळे सुशिक्षित आहोत. कुठलीबी गोष्ट असूद्या... व्हाॅटस् ॲॅपवरचा फाॅर्वर्डेड मेसेज असूद्या, नायतर न्यूज चॅनलवरची बातमी असूद्या... त्या गोष्टीची नीट, चारीबाजूनी, मेंदू वापरून चिकीत्सा केल्याशिवाय आंधळेपणानं विश्वास कसा ठेवू शकतो आपण? 'आपली बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य' , 'आपला विवेक वापरायचा अधिकार' या निसर्गानं आपल्याला दिलेली लै लै लै मोलाच्या देनग्या हायेत, त्याचा व्यवस्थित वापर करा, हे सांगीतलंवतं पाच हजार वर्षांपूर्वीच्या चार्वाकांनी... अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्ध, बसवण्णा, चक्रधरस्वामींनी... तीनशे वर्षांपूर्वीच्या तुकोबारायांनी.. आनि आजच्या दाभोलकरांपर्यन्त सगळ्यांनी ! चार्वाकाला लोकांनी जाळून मारलं... चक्रधरस्वामी आणि तुकोबाराया अचानक बेपत्ता झाले...कुणी म्हणे तुकोबा गरूडावरून वैकुंठी गेले..कुणी म्हणे चक्रधर उत्तरेकडे निघून गेले.. आणि दाभोलकरांना तर... असो.

आजच्या दिवशी फक्त अभिवादन करन्यापेक्षा त्यांचा 'विचार' पुढच्या पिढीत रूजवूया, मुरवूया, भक्कम करूया... चार्वाकासारखं किमान आपल्या घरात तरी ते आपण करू शकतो. एवढं जरी आपण केलं, तरी या महापुरूषांचं आपल्यासाठी जगणं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी मरणंबी सार्थकी लागंल !

- किरण माने.

Tuesday, 19 August 2025

 📝 शालेय समिती बैठकीचा अहवाल

दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा‌ शेरी, ता.धरणगाव जि.जळगाव. येथे शालेय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालक, अंगणवाडी सेविका, शाळेतील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले :

1. शाळेत परिपूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.

2. शाळेमध्ये १०० टक्के मुलांची नोंदणी, उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्तेची जपणूक करण्यासाठी पालक व शिक्षक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारण्याचे ठरले.

3. ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक विकासाच्या योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे ठरले.

4. गाव पातळीवर सर्व घटक (पालक, शिक्षक, शाळा समिती) यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत नेमके आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

5. शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रियेद्वारे शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची वाढ यासाठी ठोस धोरण आखण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक श्री. प्रेमलाल पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच शाळेतील शिक्षक श्री.विश्वास पाटील यांनी देखील मार्गदर्शन केले.



 📝 शालेय समिती बैठकीचा अहवाल

दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी येथे शालेय समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात आले :

1. शाळेत परिपूर्ण व सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे यावर सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.

2. शाळेमध्ये १०० टक्के मुलांची नोंदणी, उपस्थिती व शैक्षणिक गुणवत्तेची जपणूक करण्यासाठी पालक व शिक्षक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारण्याचे ठरले.


3. ग्रामपंचायतीकडून शैक्षणिक विकासाच्या योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याचे ठरले.


4. गाव पातळीवर सर्व घटक (पालक, शिक्षक, शाळा समिती) यांनी मुलांच्या शिक्षणाबाबत नेमके आणि ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले.


5. शैक्षणिक ग्रामसभा प्रक्रियेद्वारे शाळेचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची वाढ यासाठी ठोस धोरण आखण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध होईल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळेल, असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला.



Monday, 4 August 2025

 खालील चित्र हे इंग्रजी भाषा शिक्षणासाठी अत्यंत उपयुक्त साधन आहे. यावर आधारित बालवाडी व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या मजेशीर आणि शैक्षणिक अशा ऍक्टिव्हिटीज घेतल्या जाऊ शकतात. 

1. शब्द ओळख

2. चित्र शोध

3. वाक्य रचना

4. रंगभरण

5. प्रश्नोत्तर

6. कृतीवर आधारित खेळ

🎯 उद्दिष्टे (Learning Objectives):

इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवणे

चित्र निरीक्षण कौशल्य वाढवणे

वाक्यरचना शिकवणे

समजून घेणे आणि उत्तर देणे

सहभाग, संवाद आणि आत्मविश्वास वाढवणे

चित्राची ओळख, शब्दांची ओळख (Activity 1)

सूचना: चित्र बघा आणि प्रत्येक चित्रासाठी इंग्रजी शब्द सांगा.(Instruction: Look at the picture and tell the English word for each object.)


उदाहरण:

बॅट - Bat

टमाटर - Tomato

टेबल - Table

कॅलेंडर - Calendar

टीव्ही - TV / Television

केक - Cake

कोट - Coat

फोन - Telephone

कप - Cup

इरेझर - Eraser

शर्ट - Shirt

पेन - Pen



Friday, 1 August 2025

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे देशभक्तीपर गीतांसह संगीतमय कवायती (Musical Excercise Drill with Patriotic Songs) आयोजित करणे ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक प्रभावी आणि प्रेरणादायी उपक्रम.

संगीतमय कवायतीचे उपयोग व फायदे (उदाहरणासह):

१. देशभक्तीची भावना जागृत करणे

उदाहरण: 'मेरे देश की धरती, 'मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन'  अशा देशभक्तीपर गीतांच्या तालावर कवायती केल्याने विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम व देशसेवेची भावना दृढ होते.

उपयोग: राष्ट्राच्या गौरवाचे भान निर्माण होते आणि विद्यार्थी सामाजिक जबाबदारीसाठी तयार होतात.

२. शारीरिक स्वास्थ्य व शिस्तबद्धता वाढवणे

उदाहरण: तालावर आधारित  डावीकडे उजवीकडे वळण, उभे तसेच बैठे व्यायाम प्रकार यांसारख्या कवायतींमुळे शरीराचा व्यायाम होतो.

उपयोग: विद्यार्थ्यांची शरीरसंपदा सुधारते, लवचिकता वाढते व नियमितता, काटेकोरपणा आणि शिस्त या मूल्यांचा विकास होतो.

३. सांघिकतेचा विकास

उदाहरण: सर्व विद्यार्थी एकाच गाण्यावर एकसंध पद्धतीने कवायती करताना परस्पर सहकार्य, एकात्मता व तालमैल जपण्याचा प्रयत्न करतात.

उपयोग: विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, सामंजस्य, नेतृत्व व टीमवर्कचा विकास होतो.

४. सांस्कृतिक जाणीव व अभिव्यक्तीचा विकास

उदाहरण: "सारे जहाँ से अच्छा", "ए मेरे वतन के लोगो" यांसारख्या गीतांवर कवायती करताना विद्यार्थी भारताच्या सांस्कृतिक विविधतेशी एकरूप होतात.

उपयोग: विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, इतिहास, स्वातंत्र्य लढा आणि महान देशभक्तांचे योगदान समजते.

५. मनोरंजन व प्रेरणा मिळवण्याचे साधन

उदाहरण: तालबद्ध, लयबद्ध देशभक्तीपर गाणी विद्यार्थ्यांना आवडतात. त्यामुळे ते उत्साहाने व आनंदाने सहभाग घेतात.

उपयोग: मन प्रसन्न होते, ताणतणाव कमी होतो, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.

 कवायतीचे तालबद्ध सादरीकरण शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाट सर, श्री. भटू पाटील सर, सौ. वंदना पाटील आणि श्रीमती छाया घुगे यांनी केले.श्रीमती छाया घुगे यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण देखील केले.






लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी.

 आज दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, शेरी (ता. धरणगाव, जि. जळगाव) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदनाताई पाटील होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. विश्वास पाटील यांनी केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ व श्री. विश्वास पाटील यांनी अण्णाभाऊंच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोककलात्मक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या संघर्षमय जीवनाची प्रेरणा दिली. विशेषतः त्यांनी लोककथांद्वारे समाज परिवर्तनाची वाटचाल कशी घडवली, हे उदाहरणासहित विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका सौ. छायाताई घुगे यांनी आभार प्रदर्शन केले.





 वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.🌿🌳🌾 🎋

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेरी येथे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळा व परिसरात विविध प्रकारची फळझाडे, औषधी झाडे व शोभिवंत झाडे लावण्यात आली.

कार्यक्रमास गावाच्या सरपंच सौ. सुवर्णाताई कैलास बोरसे पाटील, कैलास भाऊ बोरसे, ग्रामसेविका सौ. विद्याताई पाटील, शिपाई श्री. मधुभाऊ उपस्थित होते. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. वंदनाताई पाटील, शिक्षक श्री. विश्वास पाटील, श्री. शैलेश शिरसाठ व श्रीमती. छायाताई घुगे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण व वृक्षांचे महत्त्व यावरील मार्गदर्शनाने झाली. झाडे ही प्रदूषण नियंत्रण, पावसाचे प्रमाण वाढवणे, मातीची धूप थांबवणे आणि प्राणवायू निर्माण करणे या दृष्टीने फार महत्त्वाची असल्याचे विद्यार्थ्यांना समजावण्यात आले.

🌿🌳🌾 🎋

या उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत उल्लेखनीय ठरला. प्रत्येक विद्यार्थ्याने एका झाडाची जबाबदारी घेतली. झाड लावणे, त्यास पाणी देणे, खत टाकणे आणि झाड वाढीस मदत करणे यासाठी विद्यार्थी पुढे सरसावले. ‘माझे झाड – माझी जबाबदारी’ हे ब्रीद विद्यार्थ्यांनी आत्मसात केले.

शाळेच्या परिसरात लावलेली झाडे परिसरास हिरवेगार ठेवण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी प्रेम, जबाबदारी आणि संवेदनशीलता निर्माण झाली.

कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच सौ. सुवर्णाताई कैलास बोरसे (पाटील) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षसंवर्धनासाठी शुभेच्छा दिल्या. कैलासभाऊ पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हा वृक्षारोपण उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला. गावकऱ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांची तयारी यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.