Thursday, 24 July 2025

 अहवाल: वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम

पाळधी उर्दू कन्या शाळेत वयात येणाऱ्या मुलींच्या आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सौ. मनीषा शैलेश शिरसाठ यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित विद्यार्थिनींना मासिक पाळी दरम्यानच्या स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आहार, शरीरात होणारे बदल आणि मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर माहिती दिली.

तसेच या संवादात त्यांच्या समवेत अर्चना महाजन यांनीही सहभाग घेत विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले.


या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी या विषयावर खुलेपणाने संवाद साधण्यास सुरुवात केली. शाळेतील शिक्षिका आणि उपस्थित पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

हा कार्यक्रम मुलींच्या आरोग्यविषयक शिक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.





Wednesday, 23 July 2025

 🌧️ पाऊस कसा पडतो? (How Does Rain Form?)

पाऊस पडण्याची प्रक्रिया जलचक्रावर (Water Cycle) आधारित असते. यामध्ये खालील टप्पे असतात:

1. वाफ होणे (Evaporation)

सूर्याच्या उष्णतेमुळे नद्या, तलाव, समुद्रातील पाणी वाफ होऊन हवेत जाते.

2. संघनन (Condensation)

ही वाफ थंड हवेत जाऊन लहान थेंबांमध्ये रूपांतरित होते आणि ढग तयार होतात.

3. वृष्टी (Precipitation)

जेव्हा ढगांतील पाण्याचे थेंब मोठे आणि जड होतात, तेव्हा ते पृथ्वीवर पडतात,म्हणजेच पाऊस पडतो.

🏠 घरच्या घरी करता येणारा प्रयोग (Rain Formation Experiment at Home)

🔬 साहित्य:

एक पारदर्शक काचेचा किंवा प्लास्टिकचा भांडे

गरम पाणी

प्लेट (धातूची किंवा प्लास्टिकची)

काही बर्फाचे तुकडे

🧪 प्रक्रिया:

1. भांड्यात गरम पाणी भरावे (सावधगिरीने).

2. त्या भांड्यावर प्लेट उलटी ठेवावी.

3. प्लेटवर काही बर्फाचे तुकडे ठेवावेत.

4. काही वेळात प्लेटच्या खालील बाजूला थेंब जमा होऊन खाली पडताना दिसतील.

🧠 यातून काय समजते?

गरम पाण्याची वाफ वर जाऊन थंड प्लेटला (आकाशातील थंड हवेसारखी) लागते आणि संघननामुळे पाण्याचे थेंब तयार होतात , हेच ढगात घडतं आणि नंतर थेंब पृथ्वीवर पडतात म्हणजेच पाऊस पडतो.

दैनंदिन उदाहरणे (Daily Life Examples):

1. किटलीत उकळते पाणी:

किटली उकळताना झाकणावर पाण्याचे थेंब जमा होतात ,वाफ थंड होऊन थेंबात बदलते.

2. फ्रिजमधून बाटली काढल्यावर घाम येतो:

हवेतली वाफ थंड बाटलीवर बसते — हाही संघननाचाच प्रकार आहे.

3. पावसाळ्यात डोंगराच्या आजूबाजूला ढग जास्त असतात:

डोंगरामुळे हवेत वाढलेली थंडी वाफेचे संघनन घडवते, त्यामुळे त्या भागात पाऊस अधिक पडतो.


विद्यार्थ्यांच्या अंगी निसर्गत: असलेली जिज्ञासावृत्ती जोपासण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून शोधक वृत्तीने शोध घेण्याची सवय लागली पाहिजे यासाठी.
विज्ञान उपक्रम
'असे का होते?'👇


Friday, 18 July 2025

 *साहित्यरत्न सत्यशोधकास विनम्र अभिवादन*

📙✒️📘✒️📗✒️

शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर विचारांचे वारसदार .....

"ये आझादी झुठी है और देश कि जनता भुकी है"...असे ठणकावून सांगणारे...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातासमुद्रापार "रशिया" या देशामध्ये सादर करणारे....

आद्य शिवशाहीर....

पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नसून कष्टकरी, शेतकरी, कामगार बांधवाच्या हातावर तरलेली आहे....

दीड दिवस शाळेत जाऊन अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करणारे......

दलित साहित्याचे प्रवर्तक....

"फकीरा" या कादंबरीचे लेखक....

साहित्यरत्न....

साहित्यसम्राट...

सत्यशोधक....

*▪️शिवशाहीर आण्णाभाऊ साठे* 

यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि - कोटि वंदन व त्रिवार मानाचा मुजरा !..

Friday, 4 July 2025

 शिक्षण ही एक परस्परसंवादी प्रक्रिया आहे. जसे विद्यार्थी शिकतात, तसे शिक्षकही शिकवत असताना अनुभव, ज्ञान आणि आनंद प्राप्त करतात. त्यामुळे केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शिक्षकांसाठीही (अध्यापन करणाऱ्यांसाठी) तणावमुक्त, सर्जनशील आणि प्रेरणादायी वातावरण अत्यंत आवश्यक आहे. अशा वातावरणातच खऱ्या अर्थाने "आनंददायी शिक्षण" फुलते, बहरते आणि रुजते.

🌱 तणावमुक्त वातावरण म्हणजे काय?

तणावमुक्त वातावरण म्हणजे जिथे विद्यार्थ्यांना शिकताना आणि शिक्षकांना सुलभकाच्या भूमिकेतून विषयाची मांडणी करताना मुक्तपणे विचार करता येतो, चुका करता येतात, प्रयोग करता येतात, आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य असतं.या प्रक्रियेत कुठेही भीती, दबाव, अपमान, अत्यधिक अपेक्षा, निराशा यांना स्थान नसतं.

शिक्षकांसाठी तणावमुक्त वातावरणाचे महत्त्व

1. स्वतःच्या शैलीने अध्यापनाची मुभा: शिक्षकांना जेव्हा वेळेच्या, कागदपत्रांच्या आणि अनावश्यक अहवालांच्या ओझ्यापासून मोकळीक मिळते, तेव्हा ते अधिक प्रभावीपणे आणि नवकल्पनांद्वारे शिकवू शकतात.

2. विद्यार्थ्यांशी मोकळा संवाद: दबावमुक्त शिक्षक विद्यार्थ्यांशी जवळीक निर्माण करू शकतात, त्यामुळे अध्यापन अधिक परिणामकारक होते.

3. स्वतःच्या आत्मविकासासाठी वेळ: जेव्हा शिक्षक सतत तणावात नसतात, तेव्हा ते स्वतः शिकण्यासाठी आणि सुधारण्यासाठी वेळ देऊ शकतात.

4. कामात आनंद: आनंदी शिक्षक म्हणजे वर्गात सकारात्मक ऊर्जा. ही ऊर्जा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते.

आनंददायी शिक्षण ही एक दिशा नाही, ती एक संस्कृती आहे.ती संस्कृती निर्माण होते, जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता आणि शिक्षकांच्या मनात उमेद असते.

त्यासाठी दोघांनाही तणावमुक्त, सन्मानजनक आणि प्रेरणादायी वातावरणाची अत्यंत आवश्यकता आहे.

शाळा, शिक्षक, पालक आणि प्रशासन यांचा एकत्रित प्रयत्नच हे वातावरण घडवू शकतो.

- शैलेश शिरसाठ.

लेखक शैलेश शिरसाठ हे राज्यस्तरावरील ताणतणावाचे व्यवस्थापन हा शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेला प्रशिक्षण अभ्यासक्रम निर्मिती सदस्य आहेत तसेच

राष्ट्रीय स्तरावर स्टार उपक्रमांतर्गत School leadership या राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या महाराष्ट्र राज्यासाठी मराठी अनुवाद करणाऱ्या टीमचे सदस्य आहेत.





 प्राथमिक शिक्षणात मराठी,इंग्रजी,हिंदी किंवा आणखी इतर कुठलीही भाषा शिकतांना बोली भाषेचे महत्त्व देखील असाधारण असे म्हणता येईल. बोलीभाषा तसे पहिले तर मातृभाषा असा देखील आपण त्याचा उल्लेख का करू नये असे  वाटते. कारण आपल्या आईची असणारी भाषा म्हणजे मातृभाषा. भाषिक विविधता असणाऱ्या आपल्या देशात बोलीभाषेला देखील मातृभाषा म्हणण्यास काय हरकत आहे असा प्रश्न पडतो अर्थात मातृभाषा म्हणजे राजभाषा किंवा राज्यभाषा असाही उल्लेख आहेच.

आपल्या खानदेशाचा विशेषतः जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर विद्यार्थ्यांची बोली भाषा जसे की अहिराणी, तावडी, गुर्जर भाषा, भिलाऊ किंवा भिल्ली, पावरी, तडवीभिल्ली यासारख्या भाषांनाही महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासात बोली भाषेची भूमिका खूप मोठी असते.

बोली भाषेमुळे आत्मीयता निर्माण होते. संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत आपण पूर्णवेळ जरी बोलीभाषा वापरणार नसलो तरी प्रसंगी तिचा उपयोग करता येऊ शकतो कारण त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो ते विविध शालेय सहशालेय उपक्रमात आणि कृतींमध्ये उत्साहाने सहभागी होतात असा अनुभव आहे. बोलीभाषा मातृभाषा यांच्या उपयोगाने इतर भाषा शिकतांना उपयोग होतोच पण इतर विषय शिकतांना ही होऊ शकतो असा अनुभव येतो.

 बोली भाषा ही विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा आवाज असतो. तिच्या माध्यमातून शिक्षक जर प्रसंगानुरूप आवश्यकतेनुसार संवाद साधतील, तर शिक्षणाचा स्तर केवळ माहितीवर न थांबता समज-भावना-आत्मविश्वास-प्रश्न विचारण्याची तयारी यापर्यंत पोहोचतो. त्यामुळे बोली भाषेचा योग्य वापर हा भावनिक, सामाजिक आणि बौद्धिक विकासाला चालना देणारा एक परिणामकारक मार्ग ठरू शकतो कारण तो विद्यार्थ्याला त्याचा मत व्यक्त करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतो.



 '





Teacher's Teacher, Do watch it 👇

<कारण विद्यार्थ्यांकडूनही आपल्याला खूप सार शिकायला मिळतं... आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला शिकायला मिळत म्हणून आपण शिक्षकापेक्षा विद्यार्थी आणि सुलभकाच्या भूमिकेत आहोत असं मी व्यक्तिशः मानतो आणि जाणतोही.

शिकण्यासाठी तत्पर असणाऱ्या गुरूंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा😇👍





वरील व्हिडिओ माझ्या प्रतिनियुक्ती काळातील इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनीचा असून खालील व्हिडिओ नकुल या विद्यार्थ्यांचा आहे.नकुल हा माझे मित्र शैलेश पाटील यांचा कासवे येथील विद्यार्थी‌, आता बारावीला आहे. शैलेश शिक्षक असताना मुलं आत्मविश्वासाने बोलती झाली हे पाहून विद्यार्थ्यांचा कौतुकाने काढलेला व्हिडिओ. व नंतर सन्माननीय सनेर साहेबांनी इंटरनेटवर (YouTube) पोस्ट केला. माझी पोस्ट वाचून आणि व्हिडिओ पाहून मुद्दामच मला सेंड केला.

Tuesday, 1 July 2025

रंगात रंगलो आम्ही !

 रंगात रंगलो आम्ही !

रंगकामाचा आनंद:

लहान वयातील विद्यार्थी हे मूळतः अनुभवातून शिकणारे असतात. रंगकाम करताना किंवा चित्र रंगवत असताना त्यांना विविध प्रकारे आनंद मिळतो:


१. स्वातंत्र्याची भावना – रंग निवडताना आणि भरताना त्यांना निर्णय घेण्याची संधी मिळते, जे त्यांना स्वातंत्र्याची मजा देते.


२. सर्जनशीलता व्यक्त करण्याची संधी – ते आपले विचार, भावना रंगांतून मांडू शकतात.


३. इंद्रियांचा विकास – बघणे, स्पर्श करणे, हालचाल करणे या सर्व इंद्रियांचा समन्वय होतो.


४. मनःशांती व तणावमुक्ती – रंगकाम करताना मुलांचे मन एकाग्र होते आणि त्यांना समाधान मिळते.


५. यशस्वीतेचा आनंद – रंगलेले चित्र पाहून त्यांना स्वतःबद्दल अभिमान वाटतो.

🎨 चित्रकलेच्या माध्यमातून राग शांत करण्याचे मार्ग:

1. रंगांचा वापर करून भावना व्यक्त करणे – लाल, काळा, निळा अशा रंगांद्वारे राग, दुःख, शांतता व्यक्त करता येते.

2. मुक्त चित्र रेखाटणे – कोणतेही विषय न ठरवता मनात आलेले चित्र काढल्याने ताण कमी होतो.

3. प्रकृती विषयक चित्रे – झाडे, फुले, पाणी, आकाश अशी शांतता देणारी दृश्ये काढल्याने मन स्थिर होते.

4. चित्रकलेनंतर चर्चा – शिक्षक विद्यार्थ्यांना विचारू शकतात, “हे चित्र काढताना तुला कसे वाटले?” — याने आत्मजागर वाढतो.

5. नियमित चित्रकला सत्रे – आठवड्यातून एकदा चित्रकला हा “राग नियंत्रण उपक्रम” म्हणून शाळेत घेता येतो.

Watch it👇







जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली येथे वसंतराव नाईक जयंती,कृषी दिन कार्यक्रम उत्साहात साजरा.

स्थळ: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली, केंद्र चांदसर, ता. धरणगाव, जि. जळगाव

दिनांक:१ जुलै २०२५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडली येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच श्री गजानन पाटील होते. कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना शाळेतील शिक्षक श्री. शैलेश शिरसाठ सर यांनी विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक यांचे जीवनकार्य, विशेषतः त्यांनी कृषी क्षेत्रात केलेले योगदान याविषयी माहिती दिली. त्यांनी कृषी दिनाचे महत्त्व स्पष्ट करून, विद्यार्थ्यांना शेतीचे आणि शेती व्यवसायाचे महत्त्व सांगितले. याखेरीज डॉक्टर्स दिनाचे महत्त्व देखील विद्यार्थ्यांना सांगितले.

या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. गजानन पाटील, ग्रामसेवक श्री. शामकांत पाटील, शिपाई श्री. भिका महारु सपकाळे, बचत गट प्रतिनिधी सौ.ज्योती सोनवणे तसेच ग्रामस्थ नामदेव अमरसिंग सोनवणे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडला.